मुंबई म्हटलं, की प्रथम आठवतो तो मुंबईचा समुद्रकिनारा.....पण आज काय अवस्था आहे या किनाऱ्यांची? सध्याचे किनारे प्रदूषण, प्लास्टिकचा थर यासाठीच चर्चेत आहेत. परंतु त्या पलीकडेही एक वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईच्या किनारपट्टीवरील सागरी जैवविविधता. मुंबईतही अशा प्रकारची सागरी जैवविविधता आहे, असा प्रश्न पडला असेल ना...? या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं आहे.
मुंबईत समुद्र म्हटलं, की प्रदूषणानं ग्रासलेले समुद्रकिनारे आठवतात. परंतु यापलीकडे जाऊन आपण समुद्राच्या तळाशी व समुद्रकिनारी असलेली जीवसृष्टी पाहिली आहे का..? समुद्राच्या पाण्यात आपल्याला मासे, जलचर दिसून येतात. त्याचप्रमाणे समुद्राच्या तळाशी विविध प्रकारचे खडक, शंख, शिंपले, सी फर्न, समुद्री गोगलगायी, प्रवाळ खडक म्हणजेच कोरल्स अशा प्रकारची जीवसृष्टी आढळून येते. मुंबईत गिरगाव, हाजीअलीच्या समुद्रकिनारी व तळाशी असलेली जैवविविधता पाहू शकतो.
समुद्रातील जीवसृष्टी पाहण्यासाठी लोक लक्षद्वीप, अंदमानला जातात. परंतु मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर ही जीवसृष्टी आपल्याला पाहता येऊ शकते. मुंबईतील समुद्रकिनारे या जीवसृष्टीसाठी पोषक नाहीत. परंतु त्यांनी परिस्थितीशी जुळवून या ठिकाणी आपली वाढ केली आहे. या बाबतीत अजून संशोधन होणं गरजेचं आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर अजून कोणकोणत्या प्रकारची जीवसृष्टी आहे, याचं संकलन करणं जरूरीचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विकासासाठी समुद्र किनापट्टीवर बांधकाम होतंय. परंतु त्याआधी या जीवसृष्टीचा विचार करणं जरूरीचं आहे. नाही तर येत्या काही वर्षांत ही जीवसृष्टी कायमची नष्ट होईल. आपल्या पुढच्या पिढीला हे चित्रातच बघायला मिळेल. म्हणून सागरी जैवविविधतेचं संरक्षण होणं जरूरीचं आहे.
मुंबईत आढळणाऱ्या समुद्रातील जैवविविधतेबद्दलची माहिती आम्ही सध्या फेसबुकवरच्या
‘मरीन लाइफ ऑफ मुंबई’ या पेजवरून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. उद्देश एकच आहे, तो म्हणजे या वेगळ्या विश्वाबद्दल लोकांमध्ये जागृती व्हावी, जेणेकरून अजून तरुण मुलं यात सहभागी होतील. यासाठी मी, अभिषेक साटम आणि सागरी परिस्थितीचे अभ्यासक प्रदीप पाताडे, तसेच अभिषेक जमलाबाद यांनी पुढाकार घेतला आहे.
- अभिषेक नंदकिशोर नीलम साटम
- पीएचडी विद्यार्थी, प्राणिशास्त्र (समुद्रविज्ञान)